संत सेवालाल महाराज जयंती | संत सेवालाल महाराज माहिती | Saint Sewa lal Maharaj

समाजसुधारक संत सेवालाल महाराज

आपल्या महाराष्ट्राला संतांची पुरातन अशी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या मातीला जसा पराक्रमाचा वारसा आहे तसा संतांच्या विचारांचा गंधही आहे. महाराष्ट्र भूमीत अनेक जाती धर्मातील साधूसंत प्रबोधनकार कीर्तनकारांनी जन्म घेतला. महाराष्ट्राची जडणघडणच मुळी संतांच्या विचारातून झालेली आहे. त्यांच्या शिकवणीमुळेच संपूर्ण समाज गुण्यागोविंदाने नांदत आहे. समाजातील वाईट चालीरीती अज्ञान जातीव्यवस्था नष्ट करण्याचे महत्कार्य संतमंडळींनी केले आहे. संतांची ही शिकवण आजही आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत आहे. संतांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याची आजही गरज आहे. संत महापुरुष थोर व्यक्ती हे एखाद्या विशिष्ट जातीत जन्माला येत असले तरी त्यांचे कार्य एका विशिष्ट जाती समूहापुरते कधीच नसते. संत व महापुरुषांचा प्रत्येक श्वास सृष्टीतल्या प्रत्येक जीवासाठी असतो. समाजाला योग्य मार्गाला घेऊन जाण्याचे द्रष्टेपणाचे महान कार्य संत व त्यांचे विचार करीत असतात.

फिरस्त्या व्यापाराच्या निमित्ताने भारतभर भ्रमंती करीत असतांना संत सेवालाल महाराजांना भारतातील अनेक संतांच्या कार्याविषयी माहिती मिळाली. त्यातून सत्याचा शोध घेऊन आपल्याला व समाजाला जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखविला. ते समाजात संत सेवालाल महाराज " म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचा जन्म बंजारा समाजात माघ कृष्णपक्ष 1661 मध्ये म्हणजेच दिनांक 15 फेब्रुवारी 1739 रोजी झाला. त्यांचा जन्म तेलंगणा राज्यातील गोलालडोली ता. गुत्ती, जि. अनंतपुर येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव भीमानाईक तर आईचे नाव धरमणी होते. भीमा नाईक हे तांड्याचे नाईक होते. संत सेवालाल महाराजांचा एक संत म्हणून विचार करतांना त्यांचे विचार भारतीय संत परंपरेतील भगवान महावीर, संत कबीर, संत बसवेश्वर संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांच्या तोडीचे आहेत. परंतु त्यांचे विचार अलिखित असल्याने पुस्तक स्वरूपात उशिरा आल्याने जगाला त्यांची फारशी माहिती नसावी. संत सेवालाल महाराजांचे विचार मानवतावादाची सत्य, शिकवण देणारे आहेत. समाजातील भोळ्या समजुती, अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, अनीतीचे व्यवहार, भूतदया, निसर्गप्रेम, स्वकर्तुत्वावर विश्वास, अहिंसा इत्यादींविषयी महान विचार वचने दोहे कवणे व भजने या स्वरूपात प्रकट झाले आहेत. सत्य हाच खरा धर्म आहे. नेहमी सत्याचे आचरण करावे. सत्य जाणणे यातच खरे जीवनाचे सार आहे हे सांगताना संत सेवालाल महाराज म्हणतात...

सत्यधर्म लीनता ती रेंणू ।

सदा सासी बोलंणू |

हर वातेन सोच समजन केवंणू l

भवसागर पार कर लेंणू ॥

भावार्थ : सत्य हाच खरा धर्म आहे. जीवनात नेहमी सत्याचे आचरण करावे. नमतेने लीनतेने इतरांशी वागावे. प्रत्येक गोष्टी आधी समजून उमजून घेऊनच मगच बोलावे. तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्ही जीवनरुपी भवसागर तरून जाल.

अहिंसा म्हणजे केवळ कोणाची हत्या न करणे एवढेच नसून काया, वाचा आणि मनाने कोणालाही न दुखवणे होय. गाय कितीही भाकड असले तरी तिला कधीच कसायाला विकू नका. देवी ही सर्वांची आई आहे. ती कधीच आपल्या मुलांवर कोपत नाही. दुःख, पीडा, त्रास देत नाही. तिला प्रसन्न करण्यासाठी कोंबड्या बकऱ्यांचा बळी देण्यापेक्षा बेल- फुल वाहून शिऱ्याचा नैवेद्य देऊन प्रसन्न करा. असा साधा सोपा मार्ग संत सेवालाल महाराज सांगतात.

वाडी-वस्तीनं सायी वेस ।

किटी-मुंगीनं सायी वेस ।

जीव-जणगाणीनं सायी वेस ।

बाल-बच्चानं सायी वेस ।

सेनं साथी वेस |

हे देवीमाते या सृष्टीतील सर्व प्राणिमात्रांचे रक्षण कर वाडी-वस्त्या किड्या-मुंग्यांचे रक्षण कर. सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्याचे सूत्रच जणू सेवालाल महाराज पुढील दोहयातून सांगतात...

तम सौता तमारे जीवनम |

दिवो लगा सको छो ।

कोई केनी भजो पूजो मत ।

कोई केती कमी छेनी ।

सौतर वळख सौता करलीजो ।

भजे-पुजेमं वेळ घालो मत ।

करंणी करेर शिको नरेर नारायण बंण जायो ।

जाणजो.... छाणजो... पछच मानजो...l

भावार्थ : प्रत्येक व्यक्तीत उपजतच ऊर्जा शक्ती सामर्थ्य गुणवत्ता बुद्धिमत्ता, योग्यता ही असतेच. त्यासाठी सर्वप्रथम माणसाचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. कोणीतरी येईल आणि माझे भले करील माझ्याने होणारच नाही असा न्यूनगंड कोणीही मनात बाळगू नये. तुम्ही स्वतःचे जीवन प्रकाशमान करू शकता.

छळ कपट बेईमानी करणाऱ्यांवर फटकारे ओढताना सेवालाल महाराज म्हणतात...

जे कपट वाचा लेन आये ।

पाप ओरे सोबत जाये ।

यम घरेरो फासो ओरे गळेमं पडीये ।

नव मंणेरी काया ओरी नरकेम मळजाये ।

लक्ष चौयांशी योनी भोगाये ।।

भावार्थ : कपटनीतीचा व्यवहार करून जे लोकांना फसवतील ते पापाचे भागीदार बनून नरकात जातील. चौऱ्यांशी लक्ष योनीत पापी बनून भटकत राहतील. म्हणून कोणीही कपटनीतीचा बेईमानीचा व्यवहार करू नये, असे ते सांगतात. चोर लुटारू माणसे समाजात असतील तर अशांतता पसरते अराजकता माजते. लोकांना दुःख भोगावे लागते. त्यासाठी समाजात मेहनती, नीतीवान व चारित्र्यसंपन्न लोकांचीच गरज असते. 

संत सेवालाल महाराजांनी अत्यंत प्रभावी व संवेदनशील अशी सत्यवचने दोहे सांगून समाजाला सन्मार्गाची जाणीव करून दिली आहे. संत सेवालाल महाराज निरक्षर असूनही त्यांनी समाजाला बुद्धीप्रामाण्यवादाचे इहवादाचे आणि विज्ञानाचे धडे दिलेले आहेत. त्यांची वचने दोहे ही साध्यासोप्या व सरळ अशा बंजारा बोलीतील आहे. संत सेवालाल महाराज यांचे हे क्रांतिकारी अमृततूल्य विचार केवळ बंजारा बोलीपुरते मर्यादित न राहता इतर भाषेतूनही प्रकट व्हावेत. आपण सखोल वाचू आणि चिंतन करू तरी संपणार नाही, असेच संत सेवालाल महाराजांचे विचारधन आहे.

लेखन : डॉ. सुभाष राठोड, पुणे

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

Previous Post Next Post