टोपणनाव : रमाई, रामू, रमा
जन्म : ७ फेब्रुवारी १८९८ (दाभोळ)
मृत्यू : २७ मे १९३५ (मुंबई)
वडील : भिकू धुत्रे (वलंगकर)
आई : रुक्मिणी भिकू धुत्रे ( वलंगकर)
पती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अपत्ये : यशवंत भीमराव आंबेडकर
रमाबाई भीमराव आंबेडकर / रमाई या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या.
बालपण :
रमाईंचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ (शंकर) होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.
विवाह:
सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे आहे. सुभेदारांना पोरकी रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या मार्केटमध्ये इ.स. १९०८ या वर्षी झाले.
कष्टमय जीवन :
१९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पाहवले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले व ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व अथांग प्रज्ञान आणि मृत्यू यांचे सर्जनशील ज्वलंत प्रेरणास्थान म्हणजे रमाई रमाईने अनेक मरणे पाहिली.
प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात आई वडिलांचा मृत्यू. १९१३ साली रामजी सुभेदारांचा मृत्यू. १९१४-१७ साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृत्यू. ऑगस्ट १९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू. १९२१ बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर व १९२६ मध्ये राजरत्नचा मृत्यू पाहिला. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकटी पडली. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवऱ्या सरपणासाठी वणवण फिरली. पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जाई. बॅरिस्टराची पत्नी शेण वेचते म्हणून लोक वे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर गोवऱ्या थापायला वरळीला जात असे. मुलांसाठी उपास करत असे.
निर्वाण :
रमाईची शरिर काबाड कष्टाने पोखरुन गेल होते. रमाईचा आजार बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे १९३५ ला तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत.
बोलण्याचा प्रयत्न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी २ वाजता रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावली, निर्वाण पावली आमची रमाई माऊली. पहाडासारखे महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणाऱ्या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले.
!! धैर्यशील माता रमाईस माझे कोटी कोटी प्रणाम !!
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक