राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड .
मूळ नाव : माणिक
बंडोजी इंगळे
जन्म
: ३० एप्रिल, १९०९ (यावली, जि. अमरावती)
निर्वाण : ११
ऑक्टोबर, १९६८
(मोझरी, जि. अमरावती)
गुरू
: आडकोजी महाराज
भाषा
: मराठी, हिंदी
साहित्यरचना : ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली, सेवास्वधर्म,
राष्ट्रीय भजनावली
कार्य : अंधश्रद्धा
निर्मूलन, जातिभेद
निर्मूलन
वडील
: बंडोजी
आई
: मंजुळाबाई
सुमारे नव्वद
वर्षांपूर्वीची ही गोष्ट. जयपूरकडचा एक राजा चंद्रपूरजवळच्या ताडोबा अरण्यात
शिकारीसाठी आला होता. तेथील एका गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसला होता.
राजा त्या मुलाला जंगलातील प्राण्यांविषयी विचारू लागला. तो चुणचुणीत मुलगा राजाला
म्हणाला, “हे सुखी जीव आनंदानं जंगलात नांदत आहेत. तुम्ही
त्यांना का हो ठार करता ?"
त्यावर राजा निरुत्तर झाला. तो विचार करू लागला. त्याला स्वतःची चूक कळून आली. त्याने शपथ घेतली ‘यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही.'
आपण शिकार करतो याचा अभिमान बाळगणाऱ्या राजाला ज्या उमदया मुलाने अहिंसेची शपथ घ्यायला लावली त्या मुलाचे नाव होते, 'माणिक.' पुढे 'राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज' या नावाने प्रसिद्धीस आला.
माणिकच्या वडिलांचे नाव
बंडोजी इंगळे ठाकूर व त्याच्या आईचे नाव मंजुळा. तो लहान असताना त्याच्या आईने
त्याला आपल्या अजोळी वरखेडला नेले. तिने त्याला आडकोजी महाराजांच्या सान्निध्यात
ठेवले. महाराजांनी त्याला 'तुकड्या' हे नवे नाव दिले. तुकडोजीने त्यांना गुरु
मानले.
तुकडोजी चौदा वर्षांचे
असतानाच त्यांनी घर सोडले व ते रामटेकच्या जंगलात भटकू लागले. तेथे कंदमुळांवर
गुजराण करत त्यांनी हठयोगाचा अभ्यास केला. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील
आदिवासींचे पाडे व भटक्यांची पाले धुंडाळत ते फिरले व तेथील गरीब माणसांमध्ये
रमले. खेळ, शर्यतींमध्ये पोहणे, धावणे, घोड्यावर
बैलगाड्यावर नियंत्रण साधणे, गाणे रचणे, वाद्य वाजवणे, मोठ्या ढोलांच्या तालावर नाचणे अशी
विविध कौशल्ये त्यांनी आत्मसात केली. हिंदी, उर्दू व
मराठीतील स्वतःचीच कवने ते खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत. ऐकणारे तल्लीन
होऊन तासन्तास डोलत असत. त्यांच्या या आगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना 'देवबाबा' म्हणू लागले.
आपला देश पारतंत्र्यात
होता. त्या वेळच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत १९३० सालचा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध
आहे. त्या वेळी या देवबाबांनी सत्याग्रही तरुणांच्या शिबिरांमध्ये जाऊन खंजिरी
भजनांद्वारे त्यांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली. झाडीमंडळातील 'तेजस्वी तरुण संघटना' व विदर्भातील 'आरती मंडळे' या
सेवाभावी संघटनांद्वारे स्वदेशी व ग्रामोद्योग यांचा प्रचार केला. गांधीजींनी 'छोडो भारत'ची घोषणा केली. गांधीजींच्या या चळवळीत
तुकडोजी अनुयायांसह सहभागी झाले. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.
सन १९४७ च्या स्वराज्यप्राप्तीनंतर
भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य सर्वांत महत्त्वाचे
होते. 'स्वतंत्र
भारत' उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव
सेवामंडळाने हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला.
श्री गुरुदेव सेवामंडळ
वेगवेगळ्या गावी सप्ताह,
चातुर्मास कार्यक्रम आयोजित करत असे. त्याद्वारे त्यांनी स्वच्छता,
व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन असे उपक्रम राबवले.
महाराजांनी सामुदायिक सहभोजनात सर्वांना सहभागी करून धर्म, जात,
पंथ यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला.
पंढरपूरच्या विठ्ठल
मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून सानेगुरुजींनी उपोषण केले. राष्ट्रसंत
तुकडोजीमहाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले.
आचार्य विनोबा भावे यांनी
भूदान चळवळ सुरू केली. महाराजांनी त्या चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमीन
मिळवून दिली.
त्यांचे हे महान कार्य
पाहून भारताचे
पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती
भवनात आमंत्रित केले आणि ‘राष्ट्रसंत’ या पदवीने
त्यांचा गौरव केला.
पुढे जपानमध्ये 'विश्वशांती परिषद' व 'जागतिक धर्मपरिषद' आयोजित
करण्यात आली होती. त्यांच्या उद्घाटनाकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना
निमंत्रित करण्यात आले. या परिषदांमध्ये भगवान बुद्धांच्या पंचशील तत्त्वांची
माहिती देऊन राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले. तेथे अठरा
देशांची जागतिक धर्मसंघटना गठित करण्यात आली. तिचे सल्लागार म्हणून त्यांनी
उत्कृष्ट कार्य केले. अशा साऱ्या उपक्रमांमध्ये गुंतले असतानाच त्यांनी हिंदी व
मराठीत अनेक गद्य-पदय पुस्तके लिहून प्रकाशित केली. 'ग्रामगीता'
हा त्या साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणी होय.
तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवामंडळांनी चालू ठेवले आहे.
!! पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !!
!! साभार !!
लेखक : श्री. सुदाम सावरकर