मिरगी वा फेफरे का होते?
निरोगी माणसाला अचानक झटका येणे, क्वचित बेशुद्धी येणे, हा मिरगी वा फेफऱ्याचा परिणाम असतो. फेफरे अनेक प्रकारचे असते. एखाद्या अवयवापुरता झटका येण्यापासून सर्व शरीराला आकडी येणे, बेशुद्ध पड़णे असे अनेक प्रकार दिसून येतात. यालाच इंग्रजीत 'एपीलेप्सी' असे म्हणतात. अँड माल वा मोठे फेफरे या प्रकारात सर्व शरीराला झटका येतो, तोंडाला फेस येतो, शुद्ध हरपते व तेवढ्यापुरती स्मरणशक्ती जाते. काही प्रकारच्या फेफर्यात काही काळ शुद्ध हरपते, झटके येत नाहीत. पेटीट माल वा लहान फेफरे या प्रकारात स्मरणशक्ती शाबून राहते, शुद्धही हरपत नाही. फक्त एखाद्या भागापुरताच झटका येतो.
मेंदूतल्या विशिष्ट भागातील विद्युतप्रवाहामध्ये अचानक विघाड झाल्यास फेफरे होते, हे वैद्यकशास्त्राला ज्ञात आहे. पण ते का होते, ते मात्र खात्रीने सांगता येत नाही. मिरगीच्या कारणात अनुवंशिकता, जन्माच्या वेळी डोक्याला झालेली इजा, मेंदूतील वा डोक्यातील गाठ, रक्तप्रवाहात बिघाड इत्यादींचा समावेश होतो. खूप तापात, मधुमेहासारख्या रोगात व रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी झाले, तरीही झटके येतात; पण मिरगीचे झटके बऱ्याच वेळा येतात. तसेच त्यासोबत वर सांगितलेले (मधुमेह बगैरे) आजार असतील असे नाही. मिरगीचे निदान व उपचार तज्ज्ञांकडूनच करून घ्यावे. गार्डीनल, डायलॅटीन, टेग्रेटॉल यांसारख्या परिणामकारक औषधांचा वापर करून मिरगी हा रोग नियंत्रणात ठेवता येतो. पाच वर्षांत जर व्यक्तीला एकदाही झटके आले नाही, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार थांबवता येतात.
अशा रुग्णांच्या नातेवाईकांनी झटका आलेल्या व्यक्तीची नीट काळजी घ्यावी. जीभ चावली जाऊ नये यासाठी दातांमध्ये लाकडी पट्टी वा कपडा ठेवावा. अशा व्यक्तीने मशिनवर काम करू नये, वाहन चालवू नये. तसेच पोहणे, आगीजवळ काम करणे अशा गोष्टी कदापिही करू नयेत. रुग्णाच्या जवळ त्याचे नाव, पत्ता, घेत असलेले उपचार आदी माहिती असलेले कार्ड नेहमी ठेवावे; म्हणजे अपघाताच्या वेळी वा आकस्मिकपणे काही झाल्यास त्या माहितीचा उपयोग होईल.
साभार : डॉ. अंजली दिक्षीत व डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांच्या पुस्तकातून...