व्यासपिठावरील सन्माननीय अध्यक्ष, मान्यवर व विद्यार्थीमित्रांनो...
शहीद दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो...
स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली मनी,
नाव तुमचे अजरामर झाले फासावर चढुनी ||
विद्यार्थी मित्रांनो... आज २३ मार्च, म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी हसत-हसत फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची पुण्यतिथी. २३ मार्च १९३१ रोजी शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू तिघांनाही लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. हाच दिवस 'शहिद दिन' म्हणून ओळखला जातो. आणि ह्याच वीरांच्या बलिदानाचे स्मरण व त्यांना अभिवादन करण्याच्या उद्देशाने आज आपण सर्व येथे जमलो आहोत.
वयाच्या २३ व्या वर्षीच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान देणारे सरदार भगतसिंग... सरदार भगतसिंग यांचा जन्म १९०७ च्या २८ सप्टेंबर रोजी बंगा येथे झाला. भगतसिंगांच्या जन्माच्या वेळी सरदार किशनसिंग आणि सरदार अजितसिंह यांची जेलमधून सुटका झाली, म्हणून हा मुलगा भाग्यवान आहे असे जाणून आजीने त्याचे नाव भगतसिंग ठेवले. जालियनवाला बागेचे हत्याकांड भगतसिंग यांच्या मनावर खोल परिणाम करून गेले होते. प्रसिद्ध क्रांतिकारक भगवतीचरण हे कॉलेजात भगतसिंगांच्या पुढे २ वर्षे होते तर सुखदेव हे त्यांचे वर्गमित्र होते.
वीर सावरकरांचा प्रसिद्ध ग्रंथ 'दि इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डेन्स - १८५७' भगतसिंगांना तोंडपाठ होता. घरच्या लोकांनी लग्न ठरवल्यावर त्यांनी घर सोडले. देशसेवेचे व्रत घेतल्यामुळे आपण लग्न करू शकत नाही असे वडिलांना कळवून त्यांनी त्यांची क्षमा मागितली. कानपूरला आल्यावर 'बलवंतसिंग' या नावाने त्यांनी अनेक लेख लिहिले. अनेक धाडसी सत्कार्यात ते सक्रिय होते.
लाला लजपत राय यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. त्यांना मारणाऱ्या स्कॉटचा बदला घेत असताना साँडर्स तावडीत सापडल्याने साँडर्सला उडविण्यात आले. या प्रकरणात सर्वजण फरारी झाले. क्रांतिकारकांचे म्हणणे काय आहे हे जाहीररीत्या सर्वांना समजावे यासाठी त्यांनी एक योजना आखली. 'पब्लिक सेफ्टी' बिलाविरूद्ध देशभर संताप व्यक्त होत होता. या बिलावर सेंट्रल असेंबलीत चर्चा चालू असताना बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंह यांनी असेंबलीत बाँब फेकून गोंधळ उडवून दिला. स्वतःहून अटक करून घेतली. कोर्टात आपली बाजू प्रभावीपणे मांडली. कोर्टाने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा फर्मावली. २३ मार्च १९३१ ला 'इन्कलाब झिंदाबाद' च्या घोषणा देत ते तिघेही हसत हसत फासावर चढले.
भगतसिंगांनतर दुसरे हुतात्मे होते सुखदेव रामलाल थापर... सुखदेव थापर यांचा जन्म १५ मे १९०७ रोजी लायलपूर (लुधियाना) येथे झाला. भगतसिंग यांनी असेंम्बलीमध्ये बाँब टाकल्यानंतर सुरू झालेल्या छापेसत्रात लाहोरमध्ये छापे टाकण्यात आले. तेव्हा काश्मिर बिल्डींगमध्ये पडलेल्या छाप्यात काही बाँब जप्त करण्यात आले होते. ते बाँब सुखदेव यांनी तयार केले होते, म्हणून त्यांनाही अटक करण्यात आली. लाहोर कटाच्या पहिल्या खटल्यात १६ आरोपींचा नेता म्हणूनच सुखदेव यांची नोंद करण्यात आली. नवे सदस्य गोळा करून त्यांना क्रांतिदलात समाविष्ट करून त्यांच्या लायकीप्रमाणे काम देण्यात सुखदेव तरबेज होते. लाहोर केसमध्ये त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. भगतसिंग, राजगुरूंबरोबर सुखदेव देखील २३ मार्च १९३१ ला लाहोर तुरूंगात फाशी गेलेसरदार भगतसिंग व सुखदेव यांच्या सोबत फाशी देण्यात आलेले तिसरे हुतात्मे म्हणजेच शिवराम हरी राजगुरु हे होय. राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड (सध्या राजगुरूनगर) येथे १९०८ साली झाला. जालियनवाला बाग हत्याकांडाचे पडसाद त्यांच्या मनावर चांगलेच उमटले होते. अनेक पराक्रम करून त्यांनी क्रांतिकारकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले होते. लाला लजपतरायांच्या हत्येचा सूड म्हणून त्यांनी साधलेल्या अचूक नेमबाजीमूळे साँडर्स वध घडवून आणलेला होता. पुढे फरारी असताना त्यांना फितुरीमुळे अटक झाली. लाहोर मध्ये झालेल्या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
लाहोर जेल मध्ये फाशीच्या वेळी "हे तिघेही "मेरा रंग दे बसंती चोला..." हे गीत गात गात हसत मुखाने फासावर गेले. म्हणूनच भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात २३ मार्च हा दिवस सर्वात वाईट दिवस ठरला आहे. या घटनेप्रसंगी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपला जीव गमावला. त्यातील भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू हे अग्रस्थानी होते.
आजच्या या शहीद दिनी आपण ह्या थोर आणि महान क्रांतीकारकांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या बलिदानाला सलाम करण्यासाठी येथे जमलो आहोत. शहीद दिनानिमित्त आपण स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची जाणीव ठेवावी तसेच त्यांचे हे सर्वोच्च बलिदान हे आपल्यासाठी आणि आजच्या तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी असेच आहे.
त्यांच्या निस्सीम देशभक्तीला व हौतात्म्याला कोटी कोटी नमन !!
हसत हसत चढले फासावर
इन्कलाब जिंदाबाद देत नारा
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू तुम्ही
व्यापला इतिहास भरतचा सारा
इतके बोलून मी माझ्या प्रस्ताविकास पूर्णविराम देतो/देते.
जय हिंद, जय भारत !!
संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड-नाशिक
शहीद दिन उपयुक्त भाषणे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🎙️ शहीद-भगतसिंग-इंग्रजी-माहिती
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻