एकलव्याची गुरुदक्षिणा .
गुरुदक्षिणेत अंगठा देणारा एकलव्य
एकलव्याने
गुरु द्रोणाचार्यांना जाऊन विचारले, “गुरुदेव, मला धनुर्विद्या शिकवण्याची कृपा
कराल का ?”
गुरु
द्रोणाचार्यांच्या समोर धर्मसंकट उभे राहिले; कारण त्यांनी पितामह भीष्मांना वचन
दिले होते की, केवळ राजकुमारांनाच ही विद्या शिकवीन. एकलव्य राजकुमार नव्हता,
त्यामुळे त्याला ही विद्या कशी शिकवणार ? द्रोणाचार्य एकलव्याला म्हणाले, “मी तुला
ही विद्या देऊ शकत नाही.”
एकदा
द्रोणाचार्य, पांडव, तसेच कौरव धनुर्विद्येचा सराव करण्यासाठी अरण्यात गेले.
त्यांच्या समवेत एक कुत्राही होता, जो फिरत फिरत जरा पुढे निघून गेला. तो कुत्रा
एकलव्याजवळ पोहोचला. त्याला पाहून कुत्रा भुंकायला लागला.
एकलव्याने कुत्र्याला लागू नये
आणि त्याचे केवळ भुंकणे बंद व्हावे, अशा रितीने सात बाण त्याच्या तोंडात मारले.
कुत्रा परत गुरु द्रोणाचार्य, पांडव आणि कौरव जिथे होते तिथे गेला.
गुरु
द्रोणाचार्य तर वचन देऊन बसले होते की, अर्जुनासारखा धनुर्धर दुसरा कोणीही होणार
नाही; पण हा दुसरा कोणीतरी अधिक शिकलेला धनुर्धर होता. गुरूंपुढे धर्मसंकट निर्माण
झाले. एकलव्याची अतूट श्रद्धा पाहून गुरुदेवांनी विचारले, “माझ्या मूर्तीसमोर बसून
तू धनुर्विद्या शिकलास, असे म्हणालास; पण गुरुदक्षिणा दिली नाहीस.”
एकलव्य : आपण जी मागाल ती
गुरुदक्षिणा देईन.
गुरु द्रोणाचार्य : तुझ्या उजव्या
हाताचा अंगठा दे !
एकलव्याने
एका क्षणाचाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदेवांच्या चरणी
अर्पण केला.
गुरु द्रोणाचार्य : बाळा ! अर्जुनाला मी वचन दिले असल्याने तो धनुर्विद्येत सर्वश्रेष्ठ असला, तरी जोपर्यंत आकाशात सूर्य, चंद्र आणि नक्षत्रे आहेत, तोपर्यंत लोक तुझ्या गुरुनिष्ठेचे, तुझ्या गुरुभक्तीचे स्मरण करतील, तुझी यशोगाथा गातील !
एक तरी ओवी अनुभवावी .
कौरव आणि
पांडव आश्रमात राहून शिक्षण घेत होते. एकदा त्यांच्या गुरूंना काही कामानिमित्त
बाहेरगावी जायचे होते. जातांना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ते परत येईपर्यंत
काही पाठांचा अभ्यास करण्यास सांगितले. पंधरा दिवसांनी गुरु परतले आणि प्रत्येकाने
काय काय अभ्यास केला, याविषयी विचारणा करू लागले. प्रत्येक जण आपण कसा
जास्तीतजास्त अभ्यास केला, याविषयी सांगू लागला. शेवटी धर्मराजाची पाळी आली.
धर्मराज म्हणाला, गुरुजी, मी एका वाक्याचा अभ्यास केला. धर्मराजाच्या तोंडचे उत्तर
ऐकताच गुरुजींना खूप राग आला; कारण धर्मराज हा त्यांचा अत्यंत आवडता आणि हुशार
विद्यार्थी होता. ते ओरडले, काय रे, या सर्वांपेक्षा तू मोठा आहेस, बुद्धीमान आहेस
आणि तरीसुद्धा तू केवळ एकाच वाक्याचा अभ्यास केला म्हणतोस ? तुला लाज वाटली
पाहिजे.
धर्मराज
शांतपणे म्हणाला, गुुरुजी, माझा नाईलाज आहे; परंतु एवढ्या कमी काळात मी खरंच एक
वाक्य शिकलो. गुरुजींचा पारा चढला. ते खवळले आणि म्हणाले, मूर्खा लेका, तू आळशीच
नाहीस, तर निर्लज्ज आहेस. तरीही धर्मराज शांतच होता. जराही विचलित न होता तो
म्हणाला, गुरुजी, माफ करा; पण मी खरोखरच एवढंच शिकलो. गुरुजींना राग आवरेना.
त्यांनी रागाच्या भरात धर्मराजाच्या थोबाडीत मारायला सुरुवात केली, तरीही धर्मराज
शांतच होता. त्याच्या तोंडावरचे भाव जरासुद्धा पालटले नव्हते.
आता
मात्र गुरुजी वरमले. त्यांना वाटले की, धर्मराजाच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य असले
पाहिजे. ते म्हणाले, बाळ, तू कोणते वाक्य शिकलास, ते तरी सांग. धर्मराजाने आपली
वही आणून दाखवली. तिथे लिहिले होते, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला राग येऊ देऊ
नये. या एका वाक्यासरशी गुरुजी आणि बाकी विद्यार्थी काय समजायचे, ते समजले.
विनाकारण शिक्षा केल्याविषयी गुरुजींनी धर्मराजाची क्षमा मागितली.
तात्पर्य : नुसत्या अफाट ज्ञानापेक्षा थोडे शिकले, तरी चालेल; परंतु जे शिकू, ते कृतीत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहेच, एक तरी ओवी अनुभवावी ।
शिष्य अर्जुनाचे अनुसंधान ( मनाची एकाग्रता ) .
लक्ष्याकडे संपूर्ण लक्ष असू द्या , तरच यशस्वी व्हाल !
द्रोणाचार्यांनी
झाडाच्या फांदीवर बांधलेल्या मातीच्या पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेण्यास सांगून
पक्ष्यावर नेम धरल्यावर काय दिसते, असे प्रत्येकाला विचारणे
द्रोणाचार्य कौरव आणि पांडव यांना
धनुर्विद्येचे (बाण मारण्याचे) शिक्षण देत होते. या विद्येत शिष्य प्रवीण होऊ लागले.
द्रोणाचार्यांनी शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले.
त्यासाठी त्यांनी मातीचा एक पक्षी
आणला आणि तो एका झाडाच्या फांदीवर बांधला. त्यांनी सर्व शिष्यांना एकत्र जमवले.
द्रोणाचार्य : झाडावरचा तो पक्षी
बघा. बाण मारून त्याच्या डोळ्याचा वेध कोण घेऊ शकेल, ते पाहूया. (युधिष्ठिराला
पाहून) पहिली पाळी तुझी. धनुष्याला बाण जोड. त्या पक्ष्यावर नेम धर.
युधिष्ठिराने धनुष्याला बाण जोडला
आणि पक्ष्यावर नेम धरला.
द्रोणाचार्य : आता तुला हे झाड
दिसते का ? मी दिसतो का ? तुझे भाऊ दिसतात का ?
युधिष्ठिर : मला ते झाड दिसते,
आपणही दिसता, हे भाऊही दिसतात आणि हा पक्षीही दिसतो.
द्रोणाचार्य : तू पक्ष्याच्या
डोळ्याचा वेध घेऊ शकणार नाहीस. बाजूला हो.
मग दुर्योधनाची पाळी होती.
त्यालाही द्रोणाचार्यांनी बाण जोडून नेम धरायला सांगितले.
द्रोणाचार्य : दुर्योधना, तुला हे
झाड दिसते का ? मी दिसतो का ? तुझे भाऊ दिसतात का ?
दुर्योधन : होय, मला हे झाड
दिसते. आपण दिसता. माझे भाऊही दिसतात आणि पक्षीही दिसतो.
द्रोणाचार्यांनी त्यालाही बाजूला
होण्यास सांगितले.
द्रोणाचार्यांनी अर्जुनाला ’काय
दिसते’, असे विचारल्यावर त्याने ‘मला केवळ पक्ष्याचा डोळा दिसतो’,असे सांगणे आणि
ते ऐकून द्रोणाचार्यांना आनंद होणे
इतर शिष्यांनाही द्रोणाचार्यांनी तेच
प्रश्न विचारले. सगळ्यांनी तशीच उत्तरे दिली. त्या सगळ्यांना द्रोणाचार्यांनी वेध
घेऊ दिला नाही. शेवटी त्यांनी अर्जुनाला बोलावले. अर्जुनाने धनुष्याला बाण लावला आणि
नेम धरला.
द्रोणाचार्य : अर्जुना, तुला हे
झाड दिसते का ? मी दिसतो का ? तुझे भाऊ दिसतात का ?
अर्जुन : मला केवळ पक्ष्याचा डोळा
दिसतो. झाड दिसत नाही. आपण दिसत नाही. माझे भाऊही दिसत नाहीत.
द्रोणाचार्य प्रसन्न झाले.
द्रोणाचार्य (थोडा वेळ थांबून) :
नीट विचार करून उत्तर दे. तुला पक्षीच दिसतो कि आणखी काही ते नीट सांग पाहू.
अर्जुन : मला केवळ त्या पक्ष्याचा
डोळा दिसतो. इतर काही दिसत नाही.
अर्जुनाचे हे उत्तर ऐकून द्रोणाचार्यांना आनंद झाला. ते म्हणाले, बाण सोड. अर्जुनाने बाण सोडून पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेतला. द्रोणाचार्यांनी अर्जुनाची पाठ थोपटली.
गुरुंची शिष्याला साधनेत पुढे नेण्याची तळमळ .
एक शिष्य
गुरूंनी त्याला दिलेली सेवा विनम्रपणे आणि सेवाभावाने आज्ञापालन म्हणून करत असतो. त्यामुळे
गुरु त्या शिष्याला स्वतःचा उत्तराधिकारी नेमतात. या नवीन सेवेतही त्याची सेवेची तळमळ
आणि सेवाभाव पूर्वीसारखाच असतो.
काही कालावधीनंतर दुसरा एक
कुशाग्र बुद्धीचा युवक या गुरूंचे शिष्यत्व पत्करतो आणि अल्प कालावधीतच तो गुरूंचे
मन जिंकतो. त्याच्या बुद्धीला चालना मिळावी; म्हणून गुरु उत्तराधिकारपदी असलेल्या
पूर्वीच्या शिष्याला स्वयंपाकगृहातील सेवेचे दायित्व देतात आणि या नवीन शिष्याला
त्यांचे उत्तराधिकारी नेमतात. तरीही पूर्वीच्या शिष्याच्या मनात कोणताही विकल्प न
येता तो दिलेली सेवा गुरूंना आवडेल, अशी करत असतो.
काही दिवसांनतर उत्तराधिकारी
केलेल्या शिष्याचा अहंकार वाढतो. परिणामी सहसाधक त्याच्या ऐवजी स्वयंपाकगृहात सेवा
करणार्या त्या पूर्वीच्या शिष्याकडून शंकांचे निरसन करून घेऊ लागले. हे पाहून त्या
उत्तराधिकारी शिष्याच्या मनात पहिल्या शिष्याविषयी द्वेषभावना निर्माण होते.
एक दिवस
तो गुरूंकडे जाऊन ती द्वेषभावना व्यक्त करतो. त्या वेळी गुरु त्याला म्हणाले, त्या
शिष्याला मी उत्तराधिकारीपदावरून काढून ते तुला दिले; कारण मला तुला यातून
शिकवायचे होते, सेवा कोणती करतो, यापेक्षा गुर्वाज्ञा शिरसावंद्य मानून जो
भावपूर्ण सेवा करतो, तोच गुरूंचे ख-याअर्थाने मन जिंकू शकतो. आजपासून तू आता
स्वयंपाकघरात सेवेला असणार आणि तो शिष्य माझा उत्तराधिकारी असेल.
यानंतर काही दिवसांनी हा दुसरा
शिष्य गुरूंना घरी जाण्याची अनुमती मागतो. तेव्हा श्रीगुरु शांत रहातात. त्यांना
या शिष्याने या काळात घरी जाणे अपेक्षित नसते; परंतु हा शिष्य गुरूंची अनुमती
नसतांनाही घरी जातो. बर्याच काळानंतर तो परत येतो आणि गुरूंसमोर उभा राहतो. त्या
वेळी गुरूंच्या डोळ्यांत पाणी येते आणि ते त्याच्याकडे केवळ पहातात; पण दुसर्याच
क्षणी कठोरपणे त्यांच्या उत्तराधिकारी शिष्याला आज्ञा देतात याच्यासाठी आश्रमाचे
दरवाजे बंद झाले आहेत. याने येथून चालते व्हावे.
काही
वेळाने उत्तराधिकारी शिष्य न रहावून गुरूंना विचारतो की, आपण त्या शिष्याला एवढा
कठोर निर्णय दिला; पण आपले नेत्र का पाणावले होते ? त्यावर गुरु सांगतात, त्याची साधनेत
पुढे जाण्याची पुष्कळ क्षमता होती; पण तो घरी गेला आणि वाईट संगतीमुळे साधनेचे
सर्व वैभव गमावून आज भिकारी होऊन आला. ही गोष्ट वाचल्यावर माझ्या डोळ्यांत
भावाश्रू आले.
मुलांनो, वरील कथेवरून आपल्याला लक्षात येर्इल की, गुरुआपल्या शिष्याची साधनेत प्रगती व्हावी, यासाठी सतत धडपडत असतात.
गुरु द्रोणाचार्य आणि शिष्य अर्जुन
गुरुदेव द्रोणाचार्ययांच्या विशेष कृपेला
सर्वतोपरी पात्र असलेला शिष्य अर्जुन !
१. द्रोणाचार्यांच्या काही शिष्यांना
अर्जुन खटकत असणे आणि गुरुदेवांनी अर्जुनाला धोतर आणण्यासाठी आश्रमात पाठवणे : अर्जुनावर
गुरुदेवांची विशेष कृपा आहे, असे द्रोणाचार्यांच्या काही शिष्यांना वाटत असे. त्या
सर्वांना अर्जुन खटकत असे. एकदा द्रोणाचार्य अर्जुनासह आपल्या शिष्यांना घेऊन नदीकाठी
स्नानास गेले आणि एका वटवृक्षाखाली उभे राहून म्हणाले, अर्जुना, मी आश्रमात माझे धोतर
विसरून आलो आहे ते घेऊन ये.
२. शिष्यांना मंत्रशक्तीचे
महत्त्व समजावण्यासाठी गुरुदेवांनी एक अभिमंत्रित बाण वटवृक्षाच्या पानांवर सोडणे
आणि तो बाण एकेक पान छेदत जाणे : गुर्वाज्ञा म्हणून अर्जुन धोतर आणण्यासाठी
आश्रमात गेला. त्या वेळी गुरु द्रोणाचार्य इतर शिष्यांना म्हणाले, गदा आणि धनुष्य
यांत शक्ती असते; परंतु मंत्रामध्ये यांपेक्षा अनंत पटींनी अधिक शक्ती असते.
मंत्रजप करणार्याने त्याचे माहात्म्य आणि विधी समजून घेतला, तर मंत्रात अधिक
सामर्थ्य असल्याचे लक्षात येईल. मी अभिमंत्रित अशा एकाच बाणाद्वारे या
वटवृक्षाच्या सर्व पानांना छेदू शकतो. असे म्हणून द्रोणाचार्यांनी भूमीवर एक मंत्र
लिहिला आणि त्या मंत्राने अभिमंत्रित करून एक बाण सोडला. बाण एकेक पान छेदत गेला.
ते पाहून सर्व शिष्य आश्चर्यचकित झाले.
३. परतलेल्या अर्जुनाचे
लक्ष झाडाच्या पानांकडे जाऊन त्याला जिज्ञासा वाटणे आणि भूमीवर लिहिलेला
वृक्षच्छेदनाचा मंत्र वाचून त्याने त्याचा प्रयोग करणे, त्यामुळे पानांना आणखी एक
छेद पडणे : नंतर गुरु द्रोणाचार्य सर्व शिष्यांसह स्नानासाठी गेले. एवढ्यात अर्जुन धोतर
घेऊन परत आला. त्याची दृष्टी झाडाच्या पानांकडे गेली. तो विचार करू लागला, या
वटवृक्षाच्या पानांवर अगोदर छेद नव्हते. मी सेवेसाठी गेलो असतांना गुरुदेवांनी या
शिष्यांना एखादे रहस्य शिकवलेले आहे. रहस्य शिकवलेले आहे, तर त्याचे काही सूत्र,
प्रारंभ आणि एखादे चिन्हसुद्धा असेल. अर्जुनाने इकडे तिकडे पाहिले, तर त्याला
भूमीवर एक मंत्र लिहिलेला दिसला. वृक्षच्छेदनाचे सामर्थ्य असणारा हा मंत्र अद्भूत
आहे, असे त्याच्या मनात आले. त्याने तो मंत्र वाचून धारण केला आणि माझा हा मंत्र
निश्चितच यशस्वी होईल, असा दृढनिश्चय केला. अर्जुनाने बाण उचलला आणि मंत्राचा उच्चार
करून तो सोडला. वटवृक्षाच्या पानांवर एकेक छेद होताच, अर्जुनाच्या बाणामुळे
दुसराही छेद दिसू लागला. हे पाहून अर्जुनाला आनंद झाला. गुरुदेवांनी त्यांना जी
विद्या शिकवली ती मीसुद्धा आत्मसात केली, असा विचार करून तो गुरुजींना धोतर
देण्यासाठी नदीकाठी गेला.
४. द्रोणाचार्यांनी
पानांवरील आणखी एक छेद पाहिल्यावर सर्वांना प्रश्न विचारणे : स्नान करून आल्यावर
द्रोणाचार्यांसह सर्वांनी पाहिले, वृक्षाच्या पानांना तर एकेकच छेद होता, आता
दुसरा कोणी केला ?
द्रोणाचार्य : दुसरा छेद
तुमच्यापैकी कोणी केला का ?
सर्व जण : नाही.
द्रोणाचार्य (अर्जुनाला) :
तू केलेस का ?
(अर्जुन थोडा घाबरला; परंतु
खोटे कसे बोलणार; म्हणून म्हणाला)
अर्जुन : मी तुमच्या
आज्ञेविना तुमच्या मंत्राचा प्रयोग केला; कारण मला वाटले की, तुम्ही या सर्वांना
ही विद्या शिकवलीच आहे, तर मग तुम्हाला विचारून तुमचा वेळ न घेता स्वतःच शिकून
घ्यावे. गुरुदेव, चूक झाली असेल, तर मला क्षमा करावी.
द्रोणाचार्य : नाही
अर्जुना, तुझ्यात जिज्ञासा, संयम आणि शिकण्याची तळमळही आहे, तसेच मंत्रावर तुझा
विश्वासही आहे. मंत्रशक्तीचा प्रभाव पाहून हे सर्व जण केवळ चकित होऊन स्नानासाठी
निघून गेले. यांच्यापैकी एकानेही दुसरा छेद घेण्याचा विचारही केला नाही. तू धैर्य
दाखवलेस, प्रयत्न केलास आणि यशस्वीही झालास. तू माझा सत्पात्र शिष्य आहेस.
अर्जुना, तुझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होणे अवघड आहे.
शिष्य असा जिज्ञासू असावा की ,
गुरूंचे अंतःकरण उचंबळून यावे !
संकलन : गिरीष दारुंटे , मनमाड-नाशिक
--------------------------------
--------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
--------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻