छत्रपती शिवाजी महाराज चारोळ्या

 


किती आले किती गेले

केले मुघलांना हद्दपार 

राजे बहु धरतीवरती

ना कुणा शिवबांची सर ।।

सह्याद्रीच्या रांगांवरती

सदा मुघलांच्या नजरा 

बोटे छाटली तयांची

त्या शिवबांना माझा मुजरा ।।

अशी करारी नजर सदा  

गनिमा भेदुनी पाही आरपार ।

शिवरायांमुळेच जाहले

स्वप्न स्वराज्याचे साकार ।।

सदा गायी तुझे गुणगान

असाची माझ्या पोटी वंश दे ।

फक्त तुझ्याच.. फक्त तुझ्याच..

शिवशौर्याचा तू अंश दे ।।

शब्दही पडती अपुरे

अशी शिवरायांची किर्ती ।

राजा शोभूनी दिसे जगती

अवघ्या जगाचा शिवछत्रपती ।।

अंगी संचारीता शौर्य

थरथरा कापे क्रौर्य ।

जणू कडाडती वीज

भासे तेज शिवशौर्य ।।

न्यायदानाची जयांची

असे तरहाच निराळी ।

लेणे सौभाग्याचे शाबूत

असे शिवशौर्यामुळे भाळी ।।

मायमुलीच्या स्त्रीत्वाचा

शिवबांनी केला सदैव सन्मान ।

यमसदनी धाडुनी सैतानांना

राखीली स्वराज्याची शान ।।

न काळवेळ तयांना लागे

शत्रू धारातीर्थी पाडाया ।

स्मरता शिवरायांचे शौर्य

लागे आजही इतिहास घडाया ।।

डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच

आजही वाजतोय जगती ।

राखीले स्वराज्य अबाधीत

असे हे एकमेव शिवछत्रपती ।।

राजे तुम्हीच अस्मिता

तुम्हीच महाराष्ट्राची शान ।

जगती तुम्हीच छत्रपती

तुम्हीच आमचा स्वाभिमान ।। 

  निर्मिती : गिरीष दारुंटे, मनमाड (नाशिक)