स्वामी विवेकानंद भाषण |
भारतीय हिंदू गुरु स्वामी विवेकानंद (जानेवारी १२, १८६३ - जुलै ४,१९०२) हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद ह्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त ( नरेंद्र, नरेन) असे होते. ते मूळचे बंगालचेरहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.
पूर्ण नाव : नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त (संन्यास पूर्व)
जन्म : जानेवारी १२, १८६३ (कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत )
मृत्यू : शुक्रवार: जुलै ४, १९०२ ( बेलूर, कोलकाता, भारत )
कार्यक्षेत्र : धर्म व आध्यात्म
राष्ट्रीयत्व : भारतीय
भाषा : बंगाली, इंग्रजी
प्रमुख विषय : वेदान्त
योगप्रभाव : रामकृष्ण परमहंस
वडील : विश्वनाथ दत्त
आई : भुवनेश्वरी
जन्म आणि बालपण : कलकत्त्यातील सिमलापल्ली (सिमुलिया, उत्तर कोलकाता) येथे जानेवारी १२, १८६३, सोमवारी सकाळी ६:३३:३३ वा. (पौष कृष्ण सप्तमीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला. ( जानेवारी १२, १८६३ हा दिवस योगा योगाने मकर संक्रती चा होता ) बाळाचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील) अॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा वाटा होता. नरेन्द्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली. त्याला शास्त्रीय संगीताचीदेखील जाण होती आणि त्याने बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच तो व्यायाम, खेळआदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नोरेन या शब्दाने त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इ. छंद होते.
कॉलेज शिक्षण : नरेंद्ररनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी १८७१ साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज़ इन्स्टिट्यूशन मध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्टची आणि १८८४ मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
नरेंद्रनाथांनी डेव्हिड ह्यूम, इमॅन्युएल कान्ट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विनइ विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सर च्या 'Education' या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृतआणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. १८८१-८४ मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हसी त्यांच्याबद्दल लिहितात: "नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही." त्यांना 'श्रुतिधारा' (विलक्षण स्मरणशक्ती असलेला) म्हटले जात असे. "एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते." असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते.
विवेकानंद नामकरण : राजा अजितसिंग खेत्री यांनी दि. १० मे १८९३ या दिवशी स्वामीजींना 'विवेकानंद' असे नाव दिले.
शिकागो, अमेरिका येथील सर्वधर्म परिषद : सप्टेंबर ११, १८९३ साली अमेरिकेतील शिकागो शहरातिल शिकागो - आर्ट इन्स्टिट्युट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. सुरुवातीस थोडे नर्व्हस असूनदेखील त्यांनी "अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो" अशी भाषणास सुरुवात केली आणि सात सहस्र जमावाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला जो दोन मिनिटे अखंड चालू होता. "जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन 'भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी' असे केले. 'न्यूयॉर्क क्रिटिक'ने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की "ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद् गार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत." वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.
विष काय आहे ?
असा प्रश्न विवेकानंदाना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी खुप छान उत्तर दिले...
जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ते विष बनते.
मग ती ताकद असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो....!!
कामासाठी वेळ दया कारण ती यशाची किंमत आहे. विचारासाठी वेळ दया कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे. खेळण्यासाठी वेळ दया कारण ते तारुण्याचे गुपित आहे. वाचण्यासाठी वेळ दया कारण ते ज्ञानाचा पाया आहे. आणि... स्वतःसाठी वेळ दया कारण आपण आहोत तर जग आहे. आणि अतिशय महत्वाचे दुसरयासाठी वेळ दया कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे केलेल्या परिषदेतील भाषणास ११ सप्टेंबर २०१७ रोजी १२४ वर्षे पूर्ण झाली.
समाधी : शुक्रवार, जुलै ४, १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षापर्यंत आपण जगू ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक विवेकानंद केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने उभे राहिले आहे आहे.
तत्त्वविचार आणि शिकवण : स्वामीजी हिंदू तत्त्वज्ञानाच्या 'वेदान्त' शाखेचे पुरस्कर्ते होते. आद्य शंकराचार्य यांच्या विचारांना पुढे नेत त्यांनी हे तत्त्वज्ञान प्रतिपादित केले. त्यांच्या मते सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत, त्यामुळेच 'शिवभावे जीवसेवा हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले. प्रत्येक जीव हा मूळ रूपातच ईश्वरी / दैवी आहे. अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे. कर्म किंवा पूजा किंवा मानसिक नियंत्रण किंवा तत्त्वज्ञान यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ति मिळवली पाहिजे.
उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.
त्यांचे बंगालीतील ' सखार प्रति ' म्हणजे मराठीत " मित्रास " नावाच्या कवितेतील एक अंश :
बहुरुपे सम्मुखे तोमार छाडि
कोथाय खूंजिछो ईश्वर
जीवे प्रेम करे जेई जन
सेई जन सेविछे ईश्वर
अर्थ : ईश्वर अनेक रूपाने तुझ्या समोर उभा आहे. ते सोडून तू कुठे ईश्वराला शोधतोस? जे कोणी प्राणिमात्रांवर प्रेम करतात, तेच ईश्वराची (खरी) सेवा करतात.
शिक्षण संदर्भातील विचार : शिक्षण म्हणजे एखाद्याच्या अंगी अगोदर पासून असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार होय. विधार्थी जर शाळेत येत नसेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे गेले पाहिजे.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक