छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापशाली संभाजी महाराज ह्या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या विश्ववंद्य आदर्श राजमाता जिजाऊंना त्रिवार वंदन ! जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे लखुजी जाधव यांच्या पत्नी म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई यांच्या पोटी झाला. म्हाळसाबाई ह्या निंबाळकर घराण्यातील होत्या. लखुजी जाधवांना दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि बहाद्दुरजी, हे चार पुत्र आणि जिजाऊ हि एक कन्या अशी पाच अपत्ये होती.

तत्कालीन सुखवस्तू मराठा मुलींप्रमाणे जिजाऊंचे योग्य संगोपन करण्यात आले. त्यांना दांडपट्टा, अश्वारोहण वैगरे युद्धकलांचे शिक्षण देण्यात आले. राज्यकारभाराचेही प्रशिक्षण त्यांना यादरम्यान मिळू लागले.

जिजाऊंचा विवाह मालोजी राजे भोसले यांचे चिरंजीव शहाजी राजे भोसले यांचेशी दौलताबाद येथे डिसेंबर १६०५ साली मोठ्या थाटाने संपन्न झाला. या प्रसंगी मालोजींना निजामशहा कडून पाचहजारी मनसब, शिवनेरी, व चाकण हे किल्ले आणि पुणे व सुपे हे दोन परगणे जहागीर म्हणून मिळाले. जिजाउंना एकूण सहा अपत्ये झाली. त्यापैकी चार मृत्यू पावली. संभाजी व शिवाजी हे दोन होत. शहाजींनी जिजाऊंना शिवनेरीवर किल्ल्यात सुरक्षित ठेवले. येथेच १९ फेब्रुवारी १६३० साली जिजाऊंनी शिवाजी महाराजांना जन्म दिला. जिजाऊंचे पती शहाजीराजे फार पराक्रमी सेनानी होते. त्यांनी पुण्याच्या आसपासचा अहमदनगर व विजापूरचा प्रदेश काबीज करून आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले परंतु विजापुरने ते लवकरच उध्वस्त केले.

इ.स १६३९ ते १६४७ या काळात शहाजींनी पुण्यात झांबरे पाटलाकडून जागा विकत घेवून 'लाल महाल ' नावाचा राजवाडा बांधला. जिजाऊ व शिवाजी यांचा मुक्काम लाल महालातच होता. जिजाऊंच्या आज्ञेनुसार शिवाजी आपल्या सवंगड्यासोबत युद्धकला शिकू लागले. दऱ्याखोऱ्यात फिरू लागले. तान्हाजी मालुसरे, सूर्याजी काकडे येसाजी कंक, बाजी जेथे वैगरे शेतकरयांची मुले शिवाजींचे जिवलग मित्र बनले. सर्वांवर जिजाऊंची मायेची नजर होती. शिवाजींसह सर्वजण जिजाऊंच्या आज्ञेत वागत होते.

१६ मे १६४० साली जिजाऊंनी शिवाजींचा विवाह निंबाळकरांच्या सईबाईंशी लावून दिला. यावेळी शहाजी विजापूरतर्फे बंगलोर येथे आल्यामुळे लग्नास येऊ शकले नाहीत. अशा रीतीने जिजाऊ निंबाळकरांच्या मुलीची (सईबाईची) सासू बनल्या तर वणजोगी निंबाळकरांची मुलगी दिपाबाई (मालोजींची पत्नी) ही जिजाऊंच्या सासू होत्या. २५ जूले १६४८ साली जिंजा येथे शहाजीराजांना कपटाने कैद केले, हे काम वजीर मुस्तफाखान याने केले. १६ मे १६४९ रोजी जिजाऊच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी हालचाली करून शहाजींची सुटका केली. शिवाजी महाराजांनी १० नोव्हेंबर १६५९ साली अफझलखानाचा वध केला. आणि बाजी घोरपडेस ठार केले. मुस्तफखानाचे अगोदरच निधन झाले होते. अशारीतीने जिजाऊंनी पुत्र शिवाजीस आज्ञा करून पतीच्या अपमानाचा सूड घेतला. इ.स १६५५ साली जिजाऊंचे जेष्ट पुत्र संभाजी विजापूरतर्फे लढतांना ठार झाले. १४ मे १६५७ रोजी शिवाजींची राणी सईबाई पुरंदर गडावर प्रसुत झाली. त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव संभाजी ठेवले. शिवाजींचा हा पहिला पुत्र आणि जिजाऊंचा पहिला नातू. संभाजींची आई सईबाई यांचे ५ सप्टेबर १६५९ रोजी निधन झाले.

२३ जाने. १६६४ साली तुंगभद्रेची काठी होदीगेरे येथे असतांना शहाजी शिकारीला गेले. त्यांचा घोडा भरधाव वेगात असतांना पाय रनवेलीत | अडकला आणि कोलमडला. शहाजींचे प्रतापशाली जीवन अपघातात संपले. जिजाऊ माँसाहेब विधवा झाल्या. शिवाजी महाराजांनी जिजाऊंशी विचार विनिमय करून त्यांना सती जाण्यापासून रोखले. त्या धैर्यशाली मातेने आपल्या एकुलत्या एका पुत्रास कपटी आणि खुनी औरंगजेबाच्या भेटीस आग्रा येथे जाण्यास संमती दिली. शिवरायांनी जिजाऊंच्या हाती राज्यकारभाराची सूत्रे सोपविली आणि ५ मार्च १६६६ साली राजगडावरून आग्राकडे प्रयाण केले. सिंहगड स्वराज्यात नाही याबद्धल जिजाऊंना फारच वाईट वाटत होते. त्यांनी शिवाजीस सिंहगड घेण्यास आग्रह केला. तानाजीने स्वप्राणाची आहुती देत सिंहगड ४ फेब्रुवारी १६७० साली काबीज केला. शिवाजींच्य राणी सोयराबाई राजगडावर प्रस्तुत झाल्या. २४ फेब. १६७० साली राजारामांचा जन्म झाला. पहिल्या सूर्यप्रतापी पुत्राचा म्हणजेच शिवाजी महाराजांचा राज्यभिषेकाचा सोहळा करून ६ जून १६७४ साली सिंहासनावर बसवले. सर्व उपाय थकले. १७ जून १६७४ बुधवार रात्री जिजामातेने डोळे मिटले. महाराजांचे मायेचे छत्र हरपले. स्वामी स्वराज्याच्या आईविना पोरका झाला.

जिजामाता स्वराज्याची स्फुर्ती होत्या, महाशक्ती होत्या, मातृशक्ती होत्या. महाराष्ट्राचे दोन छत्रपती घडविणाऱ्या आदर्श राजमाता होत्या शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत त्याच राज्यकारभार बघत असत. न्यायनिवाडे करीत असत. गरजवंत रयतेला सदैव मदतीसाठी तत्पर असत. तो काळ विचारात घेतला तर जिजाऊ ह्या प्रखर परिवर्तनवादी आणि रंजल्या गांजल्याच्या पालनकर्त्या राजमाता होत्या. अशा या राजमातेला कोट्यावधी वेळा नतमस्तक होवून विनम्र अभिवादन !

संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड-नाशिक

أحدث أقدم