अक्षय्य तृतीया महत्व

अक्षय्य तृतीया महत्व | Importance Of Akshayya Trutiya
अक्षय्य तृतीया महत्व
आपल्याला प्रश्न पडला असेल कि तृतीया तर दर महिन्याला येते हो !

मग याच तृतीयेचे इतके महत्व काय बरं?

"अक्षय "या शब्दाचा अर्थ काय? हे असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात येतात म्हणून किमान या लेखातुन अक्षय तृतीयेची थोडीफार तरी माहिती आपणास होईल म्हणुन हा लेख आपणा समोर सादर करतोय .

वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात. तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे. (काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन आहे). यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्रीपरशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय्य तृतीया.

अक्षय्य तृतीया हे व्रत कसे करावे?

या दिवशी व्रत करणार्‍याने प्रात:काळी स्नान करुन नरनारायणासाठी भाजलेले जव अगर गव्हाचे पीठ, परशुरामासाठी कोवळी वाळके आणि हयग्रीवासाठी भिजवलेली हरबर्‍याची डाळ घालून नैवद्य अर्पण करावा. शक्य असल्यास उपवास आणि समुद्रस्नान अथवा गंगास्नान करावे. तसेच जवस गहु, हरबरे, सातु, दहीभात, उसाचा रस दुग्धजन्य पदार्थ ( खवा, मिठाई आदी ) तसेच जलपूर्ण कुंभ, धान्य पदार्थ, सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तुंचे दान करावे. त्याचप्रमाणे पितृश्राध्द करुन ब्राह्मणभोजन घालावे. हे सर्व यथाशक्ती करण्याने अनंत फल मिळते. या तिथीस केलेले दान, हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे, असे श्रीकृष्णांनी सांगितल्याचा उल्लेख 'मदनरत्‍न' या ग्रंथात आहे. म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया हे नाव पडले आहे. या दिवशी पितृतर्पण करण्यास न जमल्यास निदान तिलतर्पण तरी करावे, असे आहे.

उन्हापासून रक्षण करणार्‍या छ्त्री जोडा इ. वस्तु दान द्यावयाच्या असतात. स्त्रियांना हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या गौरीचे त्यांना या दिवशी विसर्जन करावयाचे असते. त्या निमित्ताने स्त्रिया हळदीकुंकू करतात.

अक्षय्य तृतीया या दिवशी काय खरेदी करावे?

हा धार्मिकांचा उत्सव (सण) आहे. या दिवशी दिलेले दान अगर केलेला जप, स्नान आदी कृत्यांचे फ़ल अनंत असते. सर्वच अक्षय्य (नाश न पावणारे ) होते, यामुळेच या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात. या दिवशी तुम्ही सोने किंवा जड जवाहीर खरेदी करू शकता असे केल्याने त्यात सतत वाढ होत राहते. या दिवशी नवीन वस्त्रे, शस्त्रे, दागदागिने आदि वस्तू तयार करवतात अगर परिधान करतात. तसेच, नवीन जागा , संस्था अगर मंडळे आदी यांची स्थापना , उद्‌घाटन वगैरेही केली जातात. नवीन वाहन खरेदी केले जाते. नवीन संकल्प केले जातात तसेच नवीन व्यवसाय सुरु केले जातात. थोडक्यात काय तर कोतेही शुभ कर्म या दिवशी चालू केल्यास ते कायम स्वरूपी अक्षय राहते व टिकून राहते.

अक्षय्य तृतीया या दिवशी कोणते दान द्यावे?

या तिथीस केलेले दान आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे. म्हणून या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्व आहे. या दिवशी खालील प्रमाणे वस्तू दान केल्यास पुण्य संचय वाढतो. या दिवशी

१) या दिवशी मातीचे माठ किंवा रांजण गोर गरिबांना दान करावेत. (मुख्य म्हणजे अक्षय तृतीया या दिवसापासून माठातील थंड पाणी पिण्यास सुरवात करतात त्याने आरोग्य उत्तम राहते.)

२) या दिवशी आंबे गोर गरिबांना दान करावेत. (मुख्य म्हणजे आंबे खाण्यास सुरवातच अक्षय तृतीया या दिवसापासून करतात त्याने आरोग्य उत्तम राहते. )

३) या दिवशी मिठाई किंवा गोड पदार्थ या दिवशी गोर गरिबांना दान करावेत.

४) या दिवशी वस्त्रे किंवा कापड गोर गरिबांना या दिवशी दान करावेत.

५) या दिवशी विविध प्रकारची झाडांची रोपे खरेदी करून त्यांची आपल्या अंगणात किंवा एखाद्या मंदिरा भोवती किंवा डोंगर माथ्यावर लागवड करावी व पुढे पूर्ण वर्षभर त्यांची निगा राखावी.

६) सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी आपण आपल्या आवडत्या देवतेचे नामस्मरण किंवा मंत्र पठण करावे या दिवशी केलेल्या मंत्र पठणाचे किंवा नाम स्मरणाचे पुण्य अखंड टिकून राहते. मग चला तर या दिवशी आपण मंत्र पठणास किंवा नाम स्मरणास सुरवात करू यात. खालील पैकी कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता.

१) ll ओम नमो भगवते वासुदेवाय ll

२) ll सर्व मंगल मांग्लये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ll

3) भृगुदेव कुलं भानुं, सहस्रबाहुर्मर्दनम्।

रेणुका नयनानंदं, परशुं वन्दे विप्रधनम्।।

ll ओम रां रां परशुरामाय सर्व सिद्धी प्रदाय नम: ll

या दिवशी वरील मंत्र म्हटल्याने आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते व तिचा निवास कायम आपल्या घरात राहतो.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

أحدث أقدم