हिवताप कशामुळे होतो ?
कोणताही ताप हिवताप असू शकतो किंवा हिवताप प्राणघातक ठरू शकतो, अशी वाक्ये तुम्ही कोठेतरी वाचली असतील व या रोगाबद्दल तुमच्या मनात भीतीही निर्माण झाली असेल. हिवताप वा मलेरिया हा प्लाझ्मोडीयम नावाच्या परजीवी जंतूमुळे होणारा एक रोग आहे. या जंतूचे व्हायवॅक्स व फाल्सीफरम हे उपप्रकार भारतात प्रामुख्याने आढळतात. या रोगात हुडहुडी भरून ताप येतो. ताप एकाआड एक दिवसाने वा दोन दिवसांनी येतो. शरीराच्या यकृत/प्लीहा या भागांवर व क्वचित मेंदूवर या रोगामुळे विपरीत परिणाम होतात. रक्ताची तपासणी केल्यास, सूक्ष्मदर्शकामधून त्यात हे जंतू दिसून येतात. या रोगासाठी क्लोरोक्वीन, प्रायमाक्वीन, मेफ्लोक्वीन, मेटाकेल्फीन अशी परिणामकारक औषधे उपलब्ध आहेत. योग्य वेळी निदान होऊन उपचार मिळाल्यास रोगी पूर्णपणे बरा होतो, अन्यथा प्राणघातक गुंतागुंती निर्माण होऊ शकतात.
हिवताप हा रोग रुग्णापासून निरोगी व्यक्तीला डासांमुळे होतो. जंतूच्या वाढीसाठी व विकासासाठी त्यांना डासाच्या शरीरात राहावेच लागते. त्यामुळे डासांचा नायनाट केल्यास हिवतापाचा प्रसार थांबेल. डासांची पैदास साठलेल्या पाण्यात, गलिच्छ ठिकाणी होत असल्याने शोषखड्डे बांधून परिसर स्वच्छ ठेवून व डीडीटी सारखे कीटकनाशक फवारून त्यांचा नायनाट करता येईल व हिवतापाला आळा घालता येईल.
ताप आलेल्या व्यक्तीच्या रक्ताची तपासणी करणे, हिवतापाचे निदान झाल्यास त्यावर संपूर्ण उपचार घेणे, डासांचा नायनाट करणे व डास चावू नये यासाठी मच्छरदाणीसारख्या साधनांचा वापर केल्यास हिवताप आटोक्यात आणता येईल; तसेच त्यामुळे होणारे मृत्यूही टाळता येतील.
साभार : डॉ. अंजली दिक्षीत व डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांच्या पुस्तकातून...